शेतकऱ्यांच्या प्रश्नावर राष्ट्रवादीला मोर्चा काढण्याचा अधिकार नाही - बदामराव पंडित

उसाचे पैसे कारखान्याकडे दाबून ठेवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला 
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा अधिकार नाही -- बदामराव पंडित
====================

 गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांनी घाम गाळून कष्टाने पिकवलेल्या उसाचे पेमेंट राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जय भवानी कारखान्याने अद्यापही दिलेले नाही. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या हक्काच्या परतीच्या ठेवी परत केलेल्या नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार नाही. शेतकऱ्यांचे पैसे अडवून त्यांचा खोटा पुळका दाखवत मोर्चा काढणे म्हणजे हे विजयसिंह पंडित यांचे शेतकऱ्यांविषयी पुतनामावशीचे प्रेम असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी केला आहे.
           शेतकऱ्यांच्या पीक विमा द्या, सोयाबीन, फळबाग आणि कांदा उत्पादकांना पिक विमा नुकसान भरपाई द्या. आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते विजयसिंह पंडित हे दिनांक 29 जुलै रोजी धडक मोर्चा काढत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना शिवसेना नेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी काबाडकष्ट करून रात्रंदिवस शेतात काम करून उसाचे उत्पादन घेतले, मोठ्या अपेक्षेने जय भवानी सहकारी साखर कारखान्याला ऊस घातला. परंतु अद्यापही या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे पैसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या जय भवानी कारखान्याच्या चेअरमन व संचालकांनी दिले नाहीत. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या हक्काच्या परतीच्या ठेवी याही कारखान्याने शेतकऱ्यांना दिलेल्या नाहीत. पीक कर्जासाठी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना आजवर ज्यांनी रडवले, आपल्या ताब्यात असलेल्या साखर कारखाना आणि बाजार समितीच्या माध्यमातून नेहमीच शेतकऱ्यांना अडवण्याचे धोरण ठेवले, त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार राहिलेला नाही. त्यांचे शेतकऱ्यांविषयी हे प्रेम म्हणजे पूतनामावशीचे प्रेम आहे, हे तमाम जनतेला माहित आहे. राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेही वर्ग होत आहेत. पिक विमा कंपनीला वठणीवर आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलने करून, पिक विमा शेतकऱ्यांना देण्यास भाग पाडले आहेत. असे असताना केवळ राजकीय चर्चेत येण्यासाठी आणि आपले संपत चाललेले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी विजयसिंह पंडित हे शेतकऱ्यांचा पुळका दाखवून धडक मोर्चा काढत आहेत. असे सांगून शिवसेना नेते बदामराव पंडित म्हणाले की, त्यांच्या या नौटंकीला मतदारसंघातली जनता आता  बळी पडणार नाही. एवढाच जर त्यांना शेतकऱ्यांचा पुळका असेल तर त्यांनी जय भवानी साखर कारखान्याकडील शेतकऱ्यांच्या उसाचे व हक्काच्या परतीच्या ठेवीचे पैसे तात्काळ द्यावेत आणि मगच शेतकऱ्यांच्या इतर प्रश्नावर मोर्चे, आंदोलन करावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

युतीनंतर गेवराईत शिवसेनेच्या हालचाली वाढल्या बदामराव पंडित तातडीने मुंबईत

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

शरद पवार साहेब मराठवाड्यात चार धरणं बांधली असती तर....