बनावट कागदपत्र दाखल केलेल्या कामाचे कार्यारंभ आदेश काढू नयेत -- बदामराव पंडित
गेवराईतील बनावट कागदपत्र दाखल केलेल्या कामाचे
कार्यारंभ आदेश काढू नयेत -- बदामराव पंडित
====================
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांचे बनावट शिक्के व खोट्या सह्या करून ना हरकत व देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र दाखल केलेल्या कामाच्या प्रस्तावाचे कार्यारंभ आदेश काढू नयेत, असे लेखी निवेदन शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी कार्यकारी अभियंता सानप यांना दिले आहे. यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांचे खोटे रबरी शिक्के तयार करून बनावट सह्या करून ग्रामविकासासाठी असलेल्या 25/15 च्या कामासाठी ना हरकत प्रमाणपत्र व देखभाल दुरुस्ती प्रमाणपत्र बोगस तयार करून प्रस्तावाला जोडले आहेत. या बनावट आणि बोगस कागदपत्रांच्या आधारे उपविभागीय अभियंता मार्फत प्रस्ताव दाखल करून, काम न करता बिले लाटण्याचा प्रयत्न काही गुत्तेदारांकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील काही प्रस्तावातील कामे हे यापूर्वीच डीपीडीसी सारख्या वेगळ्या योजनेतून मंजूर झालेले आहेत. असे असताना एकाच कामावर दुसऱ्यांदा प्रस्ताव दाखल करून शासनाचा निधी हडप करण्याच्या उद्देशाने सदर प्रस्ताव दाखल करण्यात आल्याची तक्रार शिवसेनेच्या 16 सरपंचांनी कार्यकारी अभियंत्याकडे केल्यानंतर, याची दखल घेत शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनीही स्वतः पत्र देऊन, बनावट व बोगस कागदपत्र दाखल करून विकास निधी हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखण्यासाठी संबंधित कामाचे कार्यारंभ आदेश काढू नयेत. त्याचबरोबर सदर कामे करण्यासाठी ग्रामपंचायत सक्षम आहेत, ती कामे ग्रामपंचायतीनाच करून द्यावीत अशी मागणीही बदामराव पंडित यांनी कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडे केली आहे. यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, हे प्रकरण आता कोणा कोणावर शकते ? बोगस बिले दाखल करायला लावणारा कोण ? बनावट ना हरकत प्रमाणपत्रावर सह्या करणारा कोण ? याबाबत तालुक्यांमध्ये उलटसुलट चर्चा होत असून सामान्य नागरिकांतून वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.
Comments
Post a Comment