लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अमरसिंह पंडितांना दणका ; सेलू तांड्यावरील असंख्य बंजारा बांधवांचा शिवसेनेत प्रवेश

लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अमरसिंह पंडितांना दणका
सेलू तांड्यावरील असंख्य बंजारा बांधवांचा शिवसेनेत प्रवेश
=========================
माजी मंत्री बदामराव पंडित यांच्याकडून स्वागत
=======================
गेवराई ( प्रतिनिधी ) लोकसभा आणि विधानसभा निवडणूक जस-जशी जवळ येऊ लागली आहे, तसे गेवराई तालुक्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. बीड मतदारसंघातून लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी तालुक्यात चाचपणी सुरू केली असतानाच, सेलू तांड्यावरील असंख्य बंजारा पदाधिकाऱ्यांनी त्यांना सोडचिठ्ठी देत, अखेरचा जय महाराष्ट्र घालून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे  शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी गळ्यात भगवे रुमाल घालून त्यांचे स्वागत केले आहे.
                तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते दररोज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस कडून बीड जिल्हा लोकसभा मतदार संघासाठी इच्छुक असलेल्या माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी मतदारसंघात चाचपणी सुरू केली असताना, तालुक्यातील  अनेक गावचे पदाधिकारी त्यांना सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश करू लागले आहेत. दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जातेगाव सर्कलमधील सेलू तांडा येथील माजी उपसरपंच वैजिनाथ राठोड यांच्यासह प्रभू राठोड, मोहन चव्हाण, गोविंद राठोड, अंबादास राठोड, बाबू राठोड, धोंडीराम राठोड, गुलाब राठोड, उत्तम राठोड, अशोक राठोड यांच्यासह असंख्य बंजारा समाज बांधवांनी शिवसेना नेते, माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. गेवराई येथील निवासस्थानी झालेल्या या प्रवेश सोहळ्यात सर्व पदाधिकाऱ्यांचे बदामराव पंडित यांनी गळ्यात भगवे रुमाल घालून स्वागत केले. यावेळी बोलताना बदामराव पंडित म्हणाले की, गेल्या वीस वर्षाच्या राजकिय प्रवासामध्ये बंजारा समाज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा होता, म्हणूनच आपण तीन वेळेस आमदार आणि एक वेळेस मंत्री म्हणून राज्यात काम केले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकी मध्ये झालेल्या तांत्रिक चुकीमुळे आपला पराभव झाला असला तरी, तो का झाला आणि त्यामुळे आपले काय नुकसान झाले याची जाणीव मला आणि माझ्या पदाधिकाऱ्यांनाही झाली आहे. म्हणूनच आज अनेक गाव, वाडी, तांडा, वस्ती वरील असंख्य कार्यकर्ते दररोज मोठ्या विश्वासाने पुन्हा शिवसेनेत प्रवेश करू लागले आहेत. या सर्वांचे स्वागत करताना त्यांना येणाऱ्या काळात कोणतीही अडचण येऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी बदामराव पंडित यांनी दिली. कार्यक्रमास शिवसेना तालुका संघटक गणेश चव्हाण, शेख सादेक, आदींसह शिवसैनिक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शरद पवारांकडून धक्कातंत्र ; बीडसाठी राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडितच ?

वाढत्या गर्भाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डॉक्टर विद्या पवार यांनी दिला हा सल्ला