अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन ; दाभाडे परिवाराकडून नवा आदर्श

अंत्यविधीच्या तिसऱ्याच दिवशी दहावा,तेरावा व गंगापूजन करून
दाभाडे परिवाराने मराठा समाजाला घालून दिला नवा आदर्श
====================
प्रत्येक आत्मा पवित्रच ; मग निधनानंतर सुतक का पाळायचे? 

====================
गेवराई ( प्रतिनिधी ) गेवराई येथील सेवानिवृत्त तहसीलदार रामराव दाभाडे यांच्या पत्नी गंगाबाई दाभाडे यांच्या निधनानंतर त्यांच्या उच्चशिक्षित  मुला-मुलींनी अंत्यविधी करून, तिसऱ्याच दिवशी दहावा, तेरावा व गंगा पूजनाचा कार्यक्रम एकत्र करत मराठा समाजाला नवा आदर्श घालून दिला आहे. त्यांच्या या कृतीचे उपस्थित सर्व नातेवाईकांनी कौतुक करून  मराठा समाजातील प्रत्येकाने हा आदर्श घ्यावा अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
          याबाबत अधिक माहिती अशी की, सेवानिवृत्त तहसीलदार रामराव दाभाडे यांच्या पत्नी गंगाबाई दाभाडे यांचे दि 28 मार्च रोजी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. दि 29 मार्च रोजी चिंतेश्वर मंदिर परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दहावा, तेरावा आणि गंगा पूजनाच्या वेगवेगळ्या करण्यात येणाऱ्या विधीमुळे नातेवाईक व मित्र परिवारास विनाकारण त्रास होऊ नये. तसेच दुष्काळी स्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पारंपारिक पद्धतीला फाटा देत, शिवधर्म आणि सत्यशोधक समाजाच्या पध्दतीने तिसऱ्याच दिवशी सर्व विधी एकत्रितपणे  करण्याचा निर्णय गंगाबाई दाभाडे यांचे पती रामराव दाभाडे यांच्यासह डॉ वसंतराव दाभाडे, डॉ अनिलराव दाभाडे, संपत दाभाडे, प्रा सिंधुताई दाभाडे आणि निर्मला हांडगे या उच्चशिक्षित मुला-मुलींनी घेतला. तसा निर्णय सर्व नातेवाईकांना कळवला. त्या अनुषंगाने गोदावरी  नदीच्या काठी जाऊन पाणी दूषित न करता, गेवराई शहरालगत असलेल्या चिंतेश्वर मंदिर येथे दिनांक 31 मार्च रोजी सर्व विधी एकत्रित करण्यात आले. यासाठी पुरोहितांना न बोलवता, ऍड के पी काळे, अंकुशराव माने यांनी म फुले यांच्या सत्यशोधक पद्धतीने विधी पूर्ण केले. विशेष म्हणजे या सर्व विधींमध्ये मुलांप्रमाणेच सर्व मुली व सुना यांना सहभागी करण्यात आले. यावेळी नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. सर्वांनी दाभाडे परिवाराचे कौतुक करून, या कृतीचा सर्व मराठा समाज बांधवांनी आदर्श घ्यावा व कर्मकांड, जुन्या रूढी व परंपरा यांना फाटा देऊन, भविष्याचा वेध  घेत आदर्श पद्धतीचा जीवनात अवलंब करावा व मराठा समाजाची प्रगती साधावी. प्रत्येक आत्मा हा पवित्रच आहे मग निधनानंतर त्याच्यासाठी सुतक का पाळायचे ? अशा भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी नातेवाईकांकडून आलेले मोठ्या प्रमाणावर नातेवाईकांकडून आलेले वेगवेगळ्या प्रकारचे धान्य अनाथालयाला भेट देण्यात आले. तसेच नातेवाईकांसह बालग्राम मधील सहारा अनाथालयातील विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले. शेवटी सेवानिवृत्त तहसीलदार रामराव दाभाडे, डॉ वसंतराव दाभाडे, डॉ अनिल दाभाडे, संपत दाभाडे, प्रा सिंधुताई दाभाडे, सौ निर्मला हांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

पार्श्वभूमीचे संपादक गंमतभाऊ भंडारी याना नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे

जि.प .शाळेच्या विद्यार्थ्यांना मराठा प्रतिष्ठान देणार 13 हजार वह्या-पुस्तके